12 th Fail…वरीष्ठ पोलिस अधिकारी मनोज कुमार शर्मा(भापोसे) यांचा खडतर प्रवास दाखविणारा चलचित्रपट…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे – स्पर्धा परीक्षेच्या जगात ज्यांनी आपल्या आयुष्यातील, तारुण्याची महत्त्वाची वर्षे खर्च करून अपयश मिळवले असेल अशा लाखोंसाठी विधु विनोद चोप्राचा 12th fail हा सिनेमा एक इमोशनल टच आहे. हा सिनेमा ९० च्या दशकात चंबळच्या खोऱ्यातून पोलिस ऑफिसर बनण्याचे स्वप्न असणाऱ्या एका तरुणाच्या प्रचंड मानसिक व शारीरिक कष्टाचे चीज दाखवणारा चरित्रपट आहे.
पण या सक्सेस स्टोरी सोबत अपयशी ठरणाऱ्यांवरही तो अप्रत्यक्ष भाष्य करतो. IAS,IPS होण्याची  स्वप्नं साकार करण्यासाठी गावखेड्यातून, दुर्गम भागातून, निमशहरातून लाखो तरूण दिल्ली, मुंबईत ,पुणे अभ्यासाला येतात. त्यांच्या हातात व्यवहारिक जगतात काडीचीही किंमत नसलेली पण UPSC ला महत्त्वाची वाटणारी केवळ डिग्री असते. या कागदावर मग या तरुणांची सनदी सेवक होण्याची स्वप्नं उभी राहतात. ही स्वप्न साकार करण्यासाठी पोरं थोर उद्योजक नारायण मूर्ती सांगतात, त्यापेक्षा अधिक १८-१८ तास अभ्यास करत असतात. बरं हा अभ्यास करून पैसे मिळतील किंवा एखादे अवॉर्ड मिळेल असाही नाही की, ते लॉटरीचे तिकिटही नाही. (लॉटरीचे तिकिट आयुष्यात रोज काढू शकतो यूपीएसएसीला मर्यादा आहेत) एका स्वप्नाच्या दिशेने ती केवळ वाटचाल आहे. या वाटचालीचा कोणताही आखीव रेखीव, नीटनेटका, खडतर असा मार्ग नाही की फॉर्म्युला नाही. स्पर्धा परीक्षेचे जग हा एक चक्रव्युव्ह  आहे. या चक्रव्युहात हा विद्यार्थी  अडकतो ज्याला या चक्रव्युहातुन बाहेर पडता येते तो लाखातून एक IAS, IPS होतो व उरलेले त्याच चक्रव्यहात  आपापल्या परीने मार्ग शोधत राहतात.

१२ वी फेल आपल्या पुढे स्पर्धा परीक्षेचे खतरनाक जग काही मोजक्याच पण प्रभावशाली प्रसंगातून उभे करतो. या जगात अपयशी ठरलेल्या तरुणांची जगण्याची धडपड दिसते. त्यांचे प्रयत्न, कष्ट व स्वप्नांचा पाठलाग दिसतो. तुटलेली व जुळलेले प्रेम प्रकरण दिसतं. स्वार्थी माणसांचे स्वभावदर्शन दिसते. पण त्याच बरोबर अपयश आल्यास आयुष्याला ‘रिस्टार्ट’ करण्याचा एक सहज व सोपा मूलमंत्रही मिळतो. पण यापेक्षाही  हा सिनेमा ईमानदारी, तत्वनिष्ठा हे शाश्वत मूल्य अधिक ठळकपणे अधोरेखित करतो.
आपली बलाढ्य,  समजली जाणारी प्रशासकीय व्यवस्था अनेक अंतर्विरोधाने भरलेली आहे. यात संख्येने खूप कमी अधिकारी व कर्मचारी वर्ग ईमानदार दिसतो. ती ईमानदारी या लोकांच्या संघर्षमय जगण्यातून त्यांच्या कर्तव्यात आलेली असते. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्माला घातलेल्या राज्य घटनेतल्या मूल्यांवर असलेल्या नितांत श्रद्धेतूनही आलेली आहे. हीच मूल्यं आपला भारत देश, समाज, लोकशाही अधिक समृद्ध करण्याची खरी शक्ती आहे. लेखक-दिग्दर्शक-निर्माता विधु विनोद चोप्राचा हा सिनेमा अशा आशावादावर आपल्याला भिडतो व अशाच प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या हाती देश असल्याने आपण सुखाने श्वास घेत आहोत असेही अखेरीस सुचवतो.





परिंदा सारखा अजरामर सिनेमा देणाऱ्या विधु विनोद चोप्रासारख्या कसलेल्या दिग्दर्शकाची ही सेकंड इनिंग या दमदार सिनेमाच्या निमित्ताने सुरू झालेली असावी असे वाटते इतका जिवंतपणा त्याने या सिनेमात आणला आहे. आयपीएस अस्पॅरंट मनोजची भूमिका साकारणारा विक्रांत मेस्सी तर अफाटच आहे. त्याच्या सोबतचे परीक्षेत अपयशी ठरलेले मित्र, त्याची प्रेयसीही आपल्या लक्षात राहतात इतका कसदार अभिनय या सर्वांचा आहे.  ओटीटी पेक्षा चित्रपट ग्रुहात  जाऊन सिनेमॅटिक फिल घेण्यासाठी हा सिनेमा जरूर पाहावा..



एक महत्त्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो की आपल्या महाराष्ट्रात MPSC साठी लाखो मुले पुणे -मुंबईत संघर्ष करत असतात, अशा मुलांच्या जगण्यावर आपल्याकडे मराठी साहित्य विश्वात संपूर्ण अशी एकही विस्तृत कादंबरी नाही की वेबसीरिज नाही की सिनेमा नाही. आमचे मराठी लेखक, दिग्दर्शक, निर्माते लंडनची वारी मिळावी म्हणून थुतरट, टुकार सिनेमा काढतात, अशा सिनेमांचे टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून प्रमोशन करतात व सिनेमा माध्यमाचा बट्याबोळ करतात. अशा सर्वांना हिंदी सिनेमा किती बदलत चालला आहे याचे दुर्दैवाने भान नाही असे वाटून राहते.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!