
धाराशिव पोलिसांचे कार्य कौतुकास्पद : पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश
धाराशिव पोलिसांचे कार्य कौतुकास्पद : पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाबाबत अपर पोलिस महासंचालक ,फोर्स वन,(महा.राज्य) कृष्ण प्रकाश यांनी समाधान व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे आदिवासी पारधींचे पुनर्वसन, वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती, कम्युनिटी पोलिसींग यांसारखे उपक्रम राबवित असल्याबद्दल पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले आहे.



गुन्हेगारी रोखण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबवून पोलिस आणि नागरिकांमध्ये समन्वय राखण्याचे काम धाराशिव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने केले जात असल्याबाबत अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी समाधान व्यक्त केले. त्याच बरोबर आदिवासी पारधींचे पुनर्वसन, वृक्ष लागवड, शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती उत्पादनाचा बाजार, कम्युनिटी पोलिसींग यासारखे उपक्रम राबवित असल्याबद्दल पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी दोन दिवस धाराशिव जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर शुक्रवार (दि.८) रोजी त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या सह पोलिस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश म्हणाले की, धाराशिव जिल्हा हा विविध वैशिष्टयांनी परिपूर्ण आहे. येथील पोलिस दलामार्फत सतत विविध उपक्रम राबविले जातात, ही कौतुकाची बाब आहे. पोलिसाचे काम हे गुन्हेगारी रोखण्यापासून परावृत्त करुन त्यांना समाजात पुन्हा सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचेही आहे, हे जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दाखवून दिले आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठीही पुढाकार घेऊन पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यापासून दहा लाख वृक्षांची लागवड केली आहे. त्याचबरोबर आदिवासी पारधी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यांचे पुनवर्सन करुन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा म्हणून जिल्ह्यातील पोल ठाण्याच्या आवारात सेंद्रीय फळे, भाजीपाला विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात येत आहेत. तसेच कम्युनिटी पोलिसींगच्या माध्यमातून नागरिकांमध्ये समन्वय राखणे यासारखे उपक्रम राज्यासाठी पथदर्शक असल्याचे सांगून जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.


